राज्यात चक्क 661शाळा बोगस!!! अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती.
मुंबई, दि.२१ : राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे 661 शाळा या बोगस व विनामान्यता व अनाधिकृत सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही,परंतु अशा बोगस शाळा चालविणाऱ्या व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री हरिभाऊ बागडे,आशिष शेलार, अतुल भातखळकर, रईस शेख, अबू आझमी, सुनील राणे, संजय केळकर, योगेश सागर, अशोक उईके, यामिनी जाधव यांनी उपस्थित केला होता.मंत्री श्री.दिपक केसरकर म्हणाले की, या अनधिकृत शाळांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळांना कागदपत्राची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबईतील अनधिकृत शाळाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत बैठक घेऊन यावर विद्यार्थी हितासाठी सहनुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री केसरकर यांनी सांगितले. या अनधिकृत शाळांमध्ये शासन मान्यतेनेविना शाळा सुरू करणे, राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाशी संलग्नतेकरिता आवश्यक असणारे शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेणे, संबंधित परीक्षा मंडळाचे संलग्नता प्रमाणपत्र न घेणे या बाबी निदर्शनास आल्याने संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच सन 2022 मध्ये काही शाळांमध्ये शासनमान्यता आदेश हे बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.या प्रकारात बीड मधील देखील काही प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शाळांचा समावेश आहे. अशा शाळांवर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.