बीड जिल्ह्यात पटपडताळणीचा केवळ देखावा? ‘बंद पाकिटां’च्या जोरावर बोगस पटसंख्या नोंदवण्याचा जिल्हाभरात मोठा गाजावाजा!
बीड/विशेष प्रतिनिधी: राज्यात एकीकडे १९ हजार शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरत असताना, बीड जिल्ह्यात मात्र पटपडताळणीच्या नावाखाली एक वेगळाच ‘अर्थपूर्ण’ प्रकार सुरू असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. शाळांची तपासणी करण्यासाठी येणारे अधिकारी आणि संस्थाचालक यांच्यात ‘बंद पाकिटां’चे व्यवहार होऊन, प्रत्यक्ष पटसंख्येऐवजी संस्थाचालकांना हवी तशी फुगीर आकडेवारी नोंदवली जात असल्याचा खळबळजनक आरोप आता समोर येत आहे. याबाबत बीड जिल्ह्यात समोर आलेली सविस्तर माहिती अशी की, सध्या राज्यात २२ एप्रिलपर्यंत पटपडताळणीची मोहीम सुरू आहे. बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाईसह सर्वच तालुक्यांत शिक्षणाधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी शाळांना मोठ्या लावा जम्यासह भेटी देत आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य असतानाही, कागदोपत्री मात्र पट पूर्ण दाखवला जात आहे. तपासणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्वागत ‘बंद पाकिटां’नी केले जात असून, त्या बदल्यात बोगस पटसंख्येवर शिक्कामोर्तब केले जात असल्याची चर्चा जिल्हाभरात रंगली आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी केवळ नावापुरतेच पटावर आहेत. प्रत्यक्षात हे विद्यार्थी कामावर किंवा इतरत्र शिक्षण घेत आहेत. मात्र, शिक्षकांची पदे वाचवण्यासाठी संस्थाचालक धारजीने अधिकारी हे संस्थाचालकांशी संगणमत करून व संस्थाचालक अधिकाऱ्यांना हाताशी धरून शाळा शाळा मधील बोगस संख्या खरी दाखवत आहेत. भ्रष्टाचाराचे ‘नंबर १’ केंद्र: बीड जिल्ह्यात असून,यापूर्वीही शिक्षण क्षेत्रातील अनेक घोटाळे समोर आले आहेत. आता पटपडताळणीत होत असलेला हा प्रकार म्हणजे ‘अर्थपूर्ण’ तडजोडीचा कळस असल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला पात्र शिक्षक आपली नोकरी जाण्याच्या भीतीत असताना, दुसरीकडे भ्रष्ट मार्गाने पदे टिकवून ठेवण्याचा हा प्रकार शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारा आहे.’अतिरिक्त’ शिक्षकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी सेटिंग? राज्यात ३० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. यातून आपल्या शाळेतील शिक्षक वाचवण्यासाठी आणि सरकारी अनुदान लाटण्यासाठी संस्थाचालकांनी कंबर कसली आहे. तपासणी अधिकाऱ्यांनी जर निष्पक्षपातीपणे काम केले, तर बीड जिल्ह्यातील शेकडो शाळांमधील ‘बोगस’ कारभार उघड होऊ शकतो. मात्र, ‘पाकीट संस्कृती’मुळे या मोहिमेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे मौन आणि जनतेचा संताप जिल्हा प्रशासनाला या प्रकाराची कुणकुण असूनही कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर पटपडताळणी केवळ कागदावरच होणार असेल, तर या मोहिमेवर होणारा सरकारी खर्च तरी कशासाठी? असा संतप्त सवाल पालक आणि सुज्ञ नागरिकांमधून विचारला जात आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.