डॉ. ऋतुजा मुंडे यांच्या ओघवत्या वाणीतून उलगडले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महामानवी कार्य; केजवासीय मंत्रमुग्ध.
केज/प्रतिनिधी: संविधान एकता युवा मंच, केज आयोजित ‘भिम जन्मोत्सव २०२६’ निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मार्गदर्शन मालेत स्टुडन्ट व्याख्यात्या डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे यांच्या हृदयस्पर्शी आणि वैचारिक भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र आणि समकालीन भारत” या विषयावर ऋतुजाने मांडलेले विचार उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारे ठरले. केज येथील वकीलवाडी, प्रशांत नगर मधील युवा मन्चच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. ऋतुजा मुंडे यांनी बाबासाहेबांच्या बालपणापासून ते संविधान निर्मितीपर्यंतचा प्रवास अतिशय ओघवत्या शैलीत सहजपणे मांडला.त्या म्हणाल्या की, “बाबासाहेब केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण मानवजातीला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे ज्ञानसूर्य होते. त्यांचे ३२ पदव्यांचे ज्ञान हे केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हते, तर ते या देशातील शेवटच्या माणसाला सन्मान मिळवून देण्यासाठी होते.”या वेळी आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन आणि पंचशील ध्वजारोहण उत्साहात पार पडले. डॉ. ऋतुजा मुंडे यांच्या व्याख्यानानंतर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि बक्षीस वितरण करण्यात आले. बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राची प्रचिती यावेळी आलेल्या जनसमुदायातून दिसून येत होती. या कार्यक्रमाचे नियोजन संविधान एकता युवा मंचने केले होते.
एकता युवा मंचच्या विविध कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड, युवा नेते मा. रंजितदादा आडसकर, मा. अंकुश (अण्णा) इंगळे (सभापती, कृ.उ.बा. समिती), मा. आदित्यदादा पाटील, मा. हरुणभाई इनामदार यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहीले. डॉ. ऋतुजा मुंडे यांच्या भाषणादरम्यान संपूर्ण सभा मंडप ‘ टाळ्यांच्या गजरासह” जय भीम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. विशेषतः महिला आणि युवक वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. “आजच्या तरुण पिढीने बाबासाहेबांच्या पुस्तकांशी मैत्री करायला हवी,” असे आवाहनही ऋतुजा मुंडे हिने आपल्या भाषणातून केले. डॉ.ऋतुजा मुंडे यांच्या विशेष व्याख्यान वेळी प्रा. हनुमंत भोसले सर, शिवसेनेच्या सौ. रत्नमाला मुंडे यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संविधान एकता युवा मंचच्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.