मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्राला ‘भ्रष्टाचाराची वाळवी’; बीड-लातूरमध्ये ५०० कोटींचा ‘शालार्थ’ दरोडा!
बीड/लातूर | विशेष प्रतिनिधी: मराठवाड्याची शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या लातूर आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा आश्चर्यकारक असा ‘महाघोटाळा’ समोर आला आहे, ज्याने संपूर्ण राज्याची झोप उडवली आहे. ‘शालार्थ आयडी’, बोगस शिक्षक भरती आणि ‘बॅक डेटेड’ नियुक्त्यांच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवर तब्बल ५०० कोटींहून अधिक रुपयांचा दरोडा टाकण्यात आल्याचे खळबळजनक वास्तव पाठलाग न्युज ‘च्या हाती लागले असून,या घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे नवीन प्रकार समोर आले आहेत. ’परळी ते लातूर’: घोटाळ्याची कार्यपद्धती (Modus Operandi) तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१२ सालापासूनच्या जुन्या तारखांमध्ये संगनमताने शेकडो शिक्षकांच्या नियुक्त्या दाखवण्यात आल्या आहेत तर, अनेक नियुक्तीपत्रावर अधिकार्याच्या बोगस स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. ज्या काळात अधिकारी रजेवर होते किंवा पद रिक्त होते, त्या काळातील स्वाक्षऱ्या आणि शिक्के वापरून नियुक्ती पत्रे तयार करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. अपात्र उमेदवारांना शालार्थ प्रणालीमध्ये घुसवून त्यांचे ‘शालार्थ आयडी’ जनरेट करण्यात आले आणि गेल्या १० वर्षांपासून हे ‘बोगस’ शिक्षक जनतेच्या करातून लाखो रुपये पगार लाटत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे. मराठवाडा विभागातील बीड आणि लातूरमधील कारवाईचा गुप्त आणि सुप्त धडाका एसआयटी पथकाकडून चालू आहे. बीडमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिकचे नागनाथ शिंदे न्यायालयाच्या दिलाशात असले तरी, यांच्या निलंबनानंतर आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. जिल्ह्यातील सुमारे ४०० हून अधिक शिक्षक एसआयटीच्या (SIT) रडारवर आहेत. मराठवाडा विभागाच्या लातूरमधील बोगस शालार्थ आयडी चे ‘कनेक्शन’ उघड होत असून, लातूर जिल्ह्यात अनेक नामांकित शिक्षण संस्थांनी नियमबाह्य पद्धतीने संचमान्यता मिळवून शिक्षकांची पदे भरल्याचे संशय आहे. येथील अनेक ‘फाईल्स’ आता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने चौकशीसाठी ताब्यात घेतल्या आहेत. ७ जून २०२६: ‘करो या मरो’ची स्थिती! विशेष तपास पथकाने (SIT) दोन्ही जिल्ह्यांतील संशयास्पद शिक्षकांना ७ जून २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत ज्यांना आपली कागदपत्रे वैध असल्याचे सिद्ध करता येणार नाही, त्यांच्यावर: थेट फौजदारी गुन्हे (FIR) दाखल होणार. आतापर्यंत उचललेल्या पगाराची व्याजासह वसुली केली जाणार. संबंधित संस्थाचालकांवरही कारवाईची टांगती तलवार असेल. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातले हे ‘बडे मासे’ कधी जाळ्यात येणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली असून, केवळ शिक्षणाधिकारी किंवा लिपिकांच्या निलंबनाने हा प्रश्न सुटणारा नाही तर, या घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयातील बड्या अधिकारी व नेत्यांपर्यंत आणि शिक्षण क्षेत्रातील धेंडांपर्यंत पोहोचलेले आहेत. एका बाजूला डी.एड, बी.एड पदवीधर तरुण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत, तर दुसरीकडे ‘अर्थपूर्ण’ तडजोडी करून बोगस लोक खुर्च्या उबवत आहेत. ”हा केवळ पैशांचा घोटाळा नाही, तर हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी केलेला द्रोह आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.