बीडच्या निवडणुका लांबणीवर? राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या टप्प्याच्या यादीत बीड जिल्ह्याचा समावेश नाही.
बीड: राज्य निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र, या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या १२ जिल्ह्यांच्या यादीत बीड जिल्ह्याचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरील प्रशासक राजवट आणखी काही काळ कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुका उरकण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन पहिल्या टप्प्यातील नियोजनाची माहिती दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली नाही किंवा जिथे प्रभाग रचनेचे कायदेशीर पेच कमी आहेत, अशाच १२ जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातील काही तांत्रिक हरकती अद्याप पूर्णपणे निकाली न निघाल्याने, जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात स्थान मिळालेले नाही. बीड जिल्हा परिषदेच्या ५४ गटांसाठी आणि १०८ पंचायत समिती गणांसाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी सुरू केली दिसत आहे . विशेषतः केज, अंबाजोगाई आणि गेवराई सारख्या मतदारसंघांत राजकीय वातावरण तापलेले होते. मात्र, आजच्या निर्णयामुळे या इच्छुकांच्या पदरी थोडीशी निराशा पडली असून, आता इच्छुकांना दुसऱ्या टप्प्याची वाट पहावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेचच उर्वरित २० जिल्ह्यांबाबत निर्णय घेतला जाईल. बीडमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, तांत्रिक पेच सुटल्यानंतर फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चमध्ये बीडसाठी स्वतंत्र अधिसूचना निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बीडमध्ये सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी राष्ट्रवादी (दोन्ही गट) आणि भाजपमध्ये मोठी चुरस आणि तयारी पाहायला मिळत आहे. निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे स्थानिक नेत्यांना मोर्चेबांधणीसाठी अधिक वेळ मिळणार असला, तरी ग्रामीण भागातील विकासकामांवर प्रशासक राजवटीचा परिणाम होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.