बीड:राज्याचे लक्ष लागून असलेल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडला मुंबई उच्च न्यायालयाच्या छ. संभाजीनगर खंडपीठाने मोठा दणका दिला असून, न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावत, कराडला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे मा.न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील सुनावणी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चुरशीचीआणि चित्तवेधक ठरली होती. शुक्रवारी ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी कराडच्या वतीने तब्बल सहा तास प्रदीर्घ युक्तिवाद केला होता. त्यांनी पोलिसांच्या तपासावर आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, मंगळवारी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि फिर्यादीचे वकील यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीचे सर्व दावे खोडून काढले आणि ‘मकोका’ अंतर्गत झालेली कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. वकील अॅड. नितीन गवारे यांनी सरकारची बाजू भक्कमपणे माडली. बुधवारच्या सुनावणीत कराडच्या वकिलांनी १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याची विनंती बीडच्या विशेष न्यायालयाला करावी, अशी मागणी केली होती. मात्र, उच् न्यायालयाने हे प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने कराडच्या वकिलांना विचारले की, “तुम्ही जामीन अर्ज मागे घेता की आम्ही आदेश पारित करू?” वकिलांनी आदेश देण्याची विनंती केल्यानंतर, न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. या निकालानंतर आता बीडच्या विशेष न्यायालयात १९ डिसेंबर रोजी या प्रकरणातील दोष निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून, वाल्मीक कराडचा कारागृहातील मुक्काम आता पुन्हा वाढला आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.