वकील दाम्पत्याची पाण्यात बुडवून निर्घृण हत्या.प्रजासत्ताक दिनी भयानक घटना आली समोर.
क्राईम प्रतिनिधी: कायद्याचे रक्षण करुन अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देणारा लोकशाहीचा महत्वाचा प्रतिनिधी म्हणून वकील या फॅक्टर कडे बघीतले जाते परंतू,गुन्हेगारीकरण व कायद्याची मोड-तोड करुन स्वतःचेच खेटे ते खरे मानून कायदा मोडणाऱ्या कु-प्रवृत्तींची संख्या वाढत असतानाच कायद्याच्या संरक्षणासाठी न्यायमंदीरात काम करणाऱ्या एका वकील दाम्पत्याच्या कमरेवर दगडं बांधून उभयतांना पाण्यात बुडवून ठार केल्याची भयानक घटना ऐन प्रजासत्ताक दिनी समोर आल्याने न्याय क्षेत्रात एकंच खळबळ उडाली आहे.याबाबत चा प्रथमदर्शी समोर आलेला वृत्तांत असा की,
राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या आढाव दाम्पत्याचा शुक्रवारी (दि.२६) रोजी निर्घृण खून झाल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पती पत्नीचा मृतदेह उंबरे (ता.राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहिरीत आढळून आला. ऍड. राजाराम जयवंत आढाव (५२) व ऍड. मनिषा आढाव असे या दाम्पत्याचे नाव आहे. सायंकाळी त्यांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. दोघांनाही दगड बांधून विहीरीत टाकून दिल्याचे निदर्शनास आले आहे. पैशाच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले ऍड. राजाराम आढाव व ऍड. मनिषा आढाव हे दाम्पत्य गुरूवारी (दि.२५) दुपारपासून बेपत्ता होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. राहुरी न्यायालय परिसरात आज शुक्रवारी (दि.२६) ऍड. आढाव यांचे चारचाकी वाहन (क्र. एम एच १७ एइ २३९०) बेवारस अवस्थेत आढळून आले. या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता या वाहनात हातमोजे व एक बूट आढळून आला. तसेच ऍड. आढाव यांचे एटीएम आयसीआय बँकेसमोर बेवारस आढळून आले. त्यामुळे या घटनेबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. या वाहनाची तपासणी करीत असताना या वाहनाजवळ असणार्या एका चारचाकी वाहनातील चालकाने पोलिसांना पाहून पळ काढला. त्यांनंतर पोलिसांना तपासाची चक्रे फिरवत तपासाला गती दिली. मोबाईल फोन व सीसीटिव्ही कॅमेर्याच्या सहाय्याने एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीतून दाम्पत्याचा खून करून विहिरीत टाकल्याची माहिती समोर आली. या खून प्रकरणामध्ये चार आरोपींचा समावेश असल्याचेही माहिती समोर आली आहे. उंबरे (ता.राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहिरीत दुपारी तीन वाजल्यापासून दोघांचा शोध सुरू होता. रात्री उशिरा दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. मृतदेहांना दगड बांधून विहिरीत टाकण्यात आले होते. दरम्यान, या खून प्रकरणामुळे राहुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.