“उद्धव ठाकरेंमुळेच ‘मविआ’च सरकार गेलं” : शरद पवारांनी खळबळजनक गौप्यस्फोट करत उद्धव ठाकरे यांच्यावरच फोडले खापर.
मुंबई : ‘महाविकस आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात उद्धव ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यात माघार घेतली. संघर्ष न करता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला,’ असं म्हणतं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला असून, महाविकास आघाडी चे सरकार गेल्याचं खापर माजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच डोक्यावर फोडले आहे. मा.शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित अवृत्तीचे प्रकाशन आज 2 मे मंगळवारी मुंबई त पार पडले. याच पुस्तकात पवार यांनी ठाकरे यांच्याविषयी भाष्य केलं आहे. शरद पवार पुढे बोलतांना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री झाल्यावर काही जमेच्या बाजूही आहेत; मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरेंच्या शर्ट-पँट अशा मुंबईकर मध्यमवर्गीयाच्या पोषाखात सहजपणानं वावरण्याचं एक अप्रूप सर्वांनाच होते. कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकद्वारे साधलेला संवाद सहज आणि आपुलकीचा असल्यानं मध्यमवर्गाला ते फारच भावलं. त्यांना सहकार्य केलं पाहिजे, असं या वर्गाला वाटत होतं. मंत्रालयातल्या प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना होती. मंत्रालयातला वर्ग तीन आणि चारचा कर्मचारी सामान्य मुंबईकर आहे. या वर्गानं उद्धवना मनःपूर्वक साथ दिली. मात्र उद्धवना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करूनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे. ‘महाविकास आघाडी’चं जनकत्व माझ्याकडे होतं, त्यामुळे पालकाच्या भूमिकेतूनच मी याकडे पाहत होतो. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव यांच्या प्रकृतीचं वर्तमान समजत असे. मग मी स्वतःच त्यांची विचारपूस करण्यासाठी ‘मातोश्री’वर वडिलकीच्या नात्यानं गेलो होतो.आमच्यापर्यंत आलेले काही विषय उद्धवशी संपर्क करून मी कानांवर घालायचो, काय करायला हवं, याबाबतही सूचना करायचो. त्या सूचनांवर कार्यवाही होत असे,असाही माझा अनुभव आहे. राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बित्तंबातमी असायला हवी. त्याचं यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल, याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत, हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य हवं. या सर्व बाबतीत उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आम्हाला कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्यानं हे घडत असले, तरी ते टाळता आलं असतं. राजकारणात सत्ता राखण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या लागतात. परंतु ‘महाविकास आघाडी’ सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्यात राजीनामा देऊन माघार घेतली. त्याचही कारण शारीरिक हेच असावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बहुतेक सर्व मंत्री मुरब्बी असल्यामुळे, त्यांना दांडगा प्रशासकीय अनुभव असल्यामुळे अशा काळातही सरकार कृतिशील राहिलं.‘महाविकास आघाडीचं सरकार हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता. अन्य पक्षांना दडपून टाकत, लोकशाहीतल्या इतर पक्षांचं महत्त्व येनकेन प्रकारे संपवत राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या भाजपाच्या वृत्तीला ते सडेतोड उत्तर होतं.महाविकास आघाडी’चं सरकार हे भाजपाला देशभरात सर्वात मोठं आव्हान होतं. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार, याची कल्पना होतीच. आम्ही आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो परंतु या कामी शिवसेना नेतृत्व कमी पडले असे शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल,याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं. संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे ‘महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला.अशा प्रकारे शरद पवार यांनी महाविकास आघाडी चे सरकार पडल्याचे खापर पुन्हा एकदा मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर फोडले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.