बीड हादरले! २४१ कोटींच्या महाघोटाळ्यात माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून बेड्या.
बीड/लातूर/ प्रतिनिधी: बीड जिल्ह्याच्या महसूल विभागात झालेल्या ऐतिहासिक अशा २४१ कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात अखेर सर्वात मोठी कारवाई झाली आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आज पहाटे लातूरमधील त्यांच्या निवासस्थानातून पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, ‘आयएएस’ (IAS) दर्जाच्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक होण्याची ही राज्यातील दुर्मिळ घटना मानली जात आहे. याबाबतचा सविस्त वृत्तांता असा की, राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात बीडमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार: अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि बनावट आदेशानुसार शासनाच्या तिजोरीवर मोठा दरोडा टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली झालेली असतानाही, जुन्या तारखांमधील (Backdated) बनावट स्वाक्षऱ्यांचे आदेश वापरून कोट्यवधी रुपये लाटले गेले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. आकड्यांचा मायावी खेळ: ज्या जमिनींचा मूळ मोबदला ६८ कोटी रुपये होता, तो कागदोपत्री वाढवून थेट २४१ कोटी ६२ लाखांवर नेण्यात आला आहे. सरकारी तिजोरीवर महा दरोडा: शासनाची दिशाभूल करून जवळपास १७३ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर टाकण्यात आला आहे. अटकेचा थरार: पहाटे ५ वाजता निवासस्थानाला घराडा: मिळालेल्या माहितीनुसार, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी (SIT) प्रमुख तथा अपर पोलीस अधीक्षक व्यंकटरमण यांच्या पथकाने ही गुप्त मोहीम आखली होती. पहाटे ५ च्या सुमारास लातूरच्या हत्ते नगर भागातील अविनाश पाठक यांच्या आलिशान निवासस्थानाला पोलिसांनी वेढा घातला आणि त्यांना ताब्यात घेतले. अविनाश पाठक यांच्यावर गंभीर ठपका: बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच १० जणांवर गुन्हे दाखल झाले होते. पाठक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून खासगी एजंट आणि काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमान्वये गुन्हा नोंद आहे. प्रशासकीय वर्तुळात खळबळ: अविनाश पाठक हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी बीडमध्ये काम करताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते, मात्र भूसंपादनातील हा घोटाळा त्यांच्या अंगलट आला आहे. या प्रकरणात आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.”भ्रष्टाचाराचा ‘पाठलाग’ थांबणार नाही! शासनाची फसवणूक करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, हेच या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.